बीडकरांचं पुणे कनेक्शन सुरू, बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांचा शब्द पाळला
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून बीडहून पुण्यासाठी पहिल्यांदाच रेल्वे सुरू झाली, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा.
बीडकरांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बीड ते पुणे या नव्या रेल्वेगाडीला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि ही गाडी बीडहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बीडकरांमध्ये या नव्या रेल्वेगाडीबद्दल मोठी उत्सुकता आणि आनंद दिसून आला.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून बीडमधून प्रथमच पुण्यासाठी रेल्वे धावली, यामुळे बीडकरांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. यापूर्वी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाल्यामुळे जिल्ह्याला रेल्वेने जोडलं गेलं होतं, म्हणजेच बीडचं रेल्वे कनेक्शन प्रत्यक्षात आलं होतं. आता पुण्याशी थेट रेल्वे कनेक्शन झाल्याने प्रवासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे, असं मानलं जात आहे.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी बीडच्या रेल्वे प्रवासाशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाली होती, त्यावेळी पुढच्या वर्षी बीडहून थेट पुण्याला जाता येईल असा शब्द अजित पवार यांनी दिला होता, याची आठवण सुनेत्रा पवार यांनी यावेळी करून दिली आणि तो शब्द आज पूर्ण झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे हा टप्पा गाठता आला, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. "अजितदादांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळण्याचं भाग्य मला मिळालं," असं वक्तव्य त्यांनी करत या प्रकल्पात अजित पवार यांचं योगदान अधोरेखित केलं.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे बीडच्या व्यापारी वर्गाला याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रवाशांबरोबरच व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांसाठीही ही रेल्वे उपयुक्त ठरणार आहे. बीडचा विकास आणि कनेक्टिव्हिटी वाढवणं हाच आपला ध्यास असल्याचं सांगत सुनेत्रा पवार यांनी पुढील काळातही रेल्वे सुविधांसाठी प्रयत्न करत राहण्याचं आश्वासन दिलं.
खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडलेल्या मागण्यांचा उल्लेख करत बीड ते पनवेल थेट रेल्वे प्रवासासाठीही प्रयत्न करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेण्याचं आश्वासन देत त्यांनी बीड आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे बीड-पुणे रेल्वेनंतर आता बीड-पनवेल कनेक्टिव्हिटीच्या मागणीकडे बीडकरांचं लक्ष लागलं आहे.