IT क्षेत्रातील नोकरकपात: ५ मिनिटांची गूगल मीट आणि ८० भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई
एका अमेरिकन कंपनीने अवघ्या पाच मिनिटांच्या गूगल मीट कॉलमध्ये ८० भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, ही घटना रेडिटवर व्हायरल झाली.
IT क्षेत्रातील नोकरकपातीबाबत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अमेरिकन कंपनीने अवघ्या पाच मिनिटांच्या गूगल मीट कॉलमध्ये तब्बल ८० भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसोबत केवळ पाच मिनिटांची व्हिडिओ कॉल मीटिंग घेतली आणि या मीटिंगनंतर लगेचच त्यांना तात्काळ प्रभावाने बडतर्फ केल्याचे कळवले. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या कठोर वागणुकीवरून आता अनेकजण कंपनीच्या क्रूरतेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.
या घटनेतील एका कर्मचाऱ्याने रेडिटवर पोस्ट टाकून स्वतःचा अनुभव सविस्तरपणे मांडला आहे. "मला गूगल मीटवर कामावरून काढून टाकण्यात आले," असे त्याने पोस्टच्या सुरुवातीला लिहिले. आपली परिस्थिती अधिक स्पष्ट करताना त्याने पुढे सांगितले, "कालपर्यंत मी एका अमेरिकन बँकेच्या कस्टमर सपोर्ट टीममध्ये काम करत होतो. कामाच्या काही कारणांमुळे कंपनीने आम्हाला काल घरूनच काम करायला सांगितले होते. मी संध्याकाळी ६:३० च्या शिफ्टमध्ये काम करत होतो आणि रात्री ९:३० वाजता आम्हाला गूगल मीटवर बोलावून सांगण्यात आले की, संपूर्ण भारतीय कस्टमर सर्व्हिस टीमला कामावरून काढले जात आहे."
त्याने पुढे लिहिले की, "सगळे ८० कर्मचारी गेले, कोणीही उरले नाही." अवघ्या पाच मिनिटांच्या एका कॉलचा फटका तब्बल ८० कुटुंबांना बसला. आपण अशा कंपन्यांमध्ये काम करतो जिथे कधीही आपल्याला कामावरून काढले जाऊ शकते, याचे त्याला वाईट वाटले असून आपण केलेल्या मेहनतीचा आता पश्चात्ताप होत असल्याचेही त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. शिवाय, आता नोकरी गेल्यानंतर नवीन नोकरी कशी मिळणार, हा प्रश्नही त्याला सतावत आहे आणि ही परिस्थिती खूपच भयंकर असल्याचे त्याने म्हटले आहे.
या पोस्टवर रेडिटवरील अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत कंपनीच्या या क्रूर वागणुकीवर टीका केली आहे. अचानक नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. दरम्यान, एका युजरने कंपनीच्या या वर्तनामागचे आणि अचानक झालेल्या कपातीमागचे कारण विचारले असता, संबंधित कर्मचाऱ्याने स्पष्ट केले की, कंपनीला तिच्या भारतीय टीमकडून अपेक्षित चांगले काम मिळत नव्हते, त्यामुळेच ही कपात करण्यात आली.
या कर्मचाऱ्याने आणखी एक धक्कादायक बाब उघड केली. अचानक कामावरून काढल्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना कोणतीही आर्थिक भरपाई दिलेली नाही. वर्षभरापासून तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही केवळ १५ दिवसांचा पगार देण्यात आला आहे.