एआयमुळे टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचा वेग वाढला, ओरॅकलसह अनेक कंपन्यांचा मोठा निर्णय
जगभरातील टेक कंपन्यांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात नोकरकपात झाली असून, यामागे एआयचा वाढता वापर हे प्रमुख कारण सांगितलं जात आहे.
टेक क्षेत्रात पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे. मोठी कंपनी असलेल्या ओरॅकलने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढायला सुरुवात केली आहे. याआधीही या कंपनीने हजारो लोकांना काढलं होतं आणि आता परत तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पण फक्त ओरॅकलच नाही, तर जगभरात सध्या नोकऱ्या जाण्याचं सत्र सुरू आहे. यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एआय, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता.
या वर्षी तब्बल 1 लाख 28 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. layoffs.fyi नावाचं एक पोर्टल जगभरात कुठे किती जणांना कामावरून काढलं गेलं याचा हिशोब ठेवतं. त्यांच्या रिपोर्टनुसार यंदा आतापर्यंत 303 टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली असून, एकूण 1,28,873 जणांना घरी बसावं लागलं आहे. यात ओरॅकल, अमेझॉन, उबर, पेपल यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
सध्या सगळ्यात जास्त चर्चा ओरॅकलचीच सुरू आहे. या कंपनीने यंदा आधीच 21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं आणि आता परत नवीन कपातीची लिस्ट तयार होत आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे किती जणांना काढणार हे जाहीर केलेलं नाही, मात्र आतल्या बातम्यांनुसार मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे.
ओरॅकलप्रमाणेच अमेझॉन, डेल आणि मेटा या कंपन्याही यात मागे नाहीत. अमेझॉनने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातच 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. अमेझॉनही आता सगळीकडे एआयचा वापर करत असल्याने मनुष्यबळाची गरज कमी होत चालली आहे. डेल कंपनीने मार्च महिन्यात 11 हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं, यातही एआयचा मोठा वाटा होता. फेसबुकची कंपनी असलेल्या मेटानेही यंदा अनेक वेळा कर्मचारी कपात केली असून, ही कपात एक-दोन वेळा नव्हे तर अनेक फेऱ्यांमध्ये करण्यात आली आहे.
जगातल्या जवळपास सगळ्या मोठ्या कंपन्या आता एआयमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. एआयमुळे अनेक कामं आपोआप होत असल्याने माणसांची गरज कमी होत चालली आहे. कोडिंग असो, कस्टमर सपोर्ट असो किंवा डेटा तपासणं असो, ही सगळी कामं आता एआयकडून केली जात आहेत. जेव्हा मशीनच काम करू शकतं, तेव्हा जास्त कर्मचारी कशाला ठेवायचे, असा साधा हिशोब कंपन्यांचा आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत.
पूर्वी असं वाटत होतं की एआय आल्यावर नवीन नोकऱ्या निर्माण होतील, पण सध्या तरी उलट चित्र दिसत आहे. जुन्या नोकऱ्या जात आहेत आणि नवीन नोकऱ्यांसाठी वेगळं कौशल्य लागणार आहे. त्यामुळे टेक क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाला आता एआय शिकणं गरजेचं ठरणार आहे, अन्यथा नोकरी टिकवणं अवघड होऊ शकतं.