उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावच्या घरी गौराईचे आगमन
सातारा जिल्ह्यातील दरे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गौराईचे वाजतगाजत आगमन झाले, कुटुंबासह गावकऱ्यांनीही गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
गणपती बाप्पा सोमवारपासून प्रत्येक घरात आणि चौकाचौकात विराजमान झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात सर्वत्र बाप्पांचं स्वागत झालं. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' च्या गजरात बाप्पा घराघरात दाखल झाल्यानं गणेशभक्तीला उधाण आलं आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी गौराईचं स्वागत करण्याची पद्धत असते, याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही गौराईचं आगमन झालं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी, म्हणजे सातारा जिल्ह्यातील दरे गावातील घरी पोहोचले. तिथे त्यांनी गौरी-गणपत्तीचं दर्शन घेतलं आणि गावातील पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, "दर वर्षी आमच्या गावच्या घरात गणपती असतो, त्या निमित्तानं मी गावच्या घरी गणपत्तीसाठी येत असतो. देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातो, जिथं जिथं मराठी माणसं आहेत तिथं गणेशोत्सव साजरा केला जातो. मी गावात येऊन वृक्षलागवड करतो, वाढतं ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेता वृक्षलागवड केली पाहिजे. करोडो झाडं शासनाच्या वतीनं लावली गेली आहेत. कोण माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करतात यावर मी लक्ष देत नाही."
दरे गावातील घरात मोठ्या उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात आला. याच निमित्तानं घरात गौराईचंही वाजतगाजत आगमन झालं. रात्री उशिरापर्यंत शिंदे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन भजन, पारंपरिक जाखडी नृत्य आणि सामूहिक आरती असे अनेक कार्यक्रम राबवले. सामूहिक आरतीमुळं संपूर्ण घर भक्तिभावानं भरून गेल्याचं पाहायला मिळालं.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग दिसून आला. विशेष म्हणजे या उत्सवात केवळ शिंदे कुटुंबच नव्हे, तर गावातील इतर लोकांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. भजन आणि जाखडी नृत्यासारख्या पारंपरिक कार्यक्रमांमध्ये गावकरी एकत्र आले आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय बनलं. जिथं जिथं मराठी माणसं आहेत तिथं गणेशोत्सव साजरा केला जातो, या भावनेतून दरे गावातील हा उत्सव कुटुंब आणि गाव अशा दोघांनाही एकत्र आणणारा ठरला.