'गोंधळ'ची ऑस्करसाठी निवड, दिग्दर्शक संतोष डावखर यांचा प्रवास प्राध्यापकापासून चित्रपटापर्यंत
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड केली आहे.
मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट घडली आहे. संतोष डावखर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'गोंधळ' या मराठी सिनेमाची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी, म्हणजे ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 18 सप्टेंबरला ही घोषणा केली. देशभरातून एकूण 33 सिनेमे पाठवले गेले होते, त्यातून 'गोंधळ'ची 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' या कॅटेगरीसाठी निवड झाली.
संतोष डावखर हे फिल्ममेकर म्हणून नाव कमावण्याआधी वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत होते. त्यांच्या 'डावखर फिल्म्स' या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ते प्रोजेक्ट कन्सल्टंट आणि सोशल अॅक्टिव्हिस्ट म्हणूनही काम करतात. त्यांच्या करिअरची सुरुवात प्राध्यापक म्हणून झाली होती.
सिनेमाकडे वळण्याआधी विविध अनुभव घेतल्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये स्क्रीनप्ले रायटिंगचा शॉर्ट कोर्स केला. त्यानंतर सामाजिक विषयांवर आधारित सिनेमे आणि शॉर्ट फिल्म्स बनवत त्यांनी या क्षेत्रात काम सुरू केलं.
डावखर यांच्या सुरुवातीच्या शॉर्ट फिल्म्समध्ये 'अज्ञात' या प्रोजेक्टचा समावेश होतो, ज्यात वर्गभेदाचा विषय मांडला होता. या फिल्मची निवड आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्ये झाली आणि तिला अनेक पुरस्कारही मिळाले. याशिवाय डावखर यांनी कॅशलेस इकॉनॉमीशी संबंधित एका सरकारी जाहिरातीचंही दिग्दर्शन केलं आहे.
आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि फेस्टिव्हल्सच्या संपर्कात आल्यामुळे डावखर यांची सिनेमाबद्दलची आवड आणखी वाढली. खास करून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये घालवलेल्या वेळेचा 'गोंधळ'च्या निर्मितीवर मोठा प्रभाव पडल्याचं त्यांनी सांगितलं. डावखर यांनी सांगितलं की कान्समध्ये असताना ते रोज अनेक सिनेमे बघत असत. या अनुभवातून त्यांना आंतरराष्ट्रीय नजरेतून बघता येईल असा सिनेमा बनवण्याची प्रेरणा मिळाली.
'गोंधळ' बनवण्यामागचा विचार सांगताना डावखर यांनी आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्समध्ये बघितलेल्या सिनेम्यांचा प्रभाव असल्याचं सांगितलं. भारतातली संस्कृती आणि वारसा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर मांडणारी गोष्ट तयार करायची, अशी त्यांची इच्छा होती.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून 'गोंधळ'ची निवड केली. यंदा एकूण 33 सिनेमे ऑस्करच्या निवड प्रक्रियेसाठी पाठवले गेले होते. यात सर्वाधिक 14 हिंदी सिनेमे होते. मराठी, तेलुगू आणि गुजराती भाषेतले प्रत्येकी चार सिनेमे यात होते. याशिवाय तीन तमिळ, एक मल्याळम आणि एक नागामीज सिनेमाही या प्रक्रियेत होता. या यादीत एका मूक सिनेमाचाही समावेश होता, हे विशेष.
आता 'गोंधळ'च्या माध्यमातून संतोष डावखर यांचा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती पुढे जातो, याकडे मराठी सिनेसृष्टीसह सिनेमाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.