IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शेफालीचा धुमाकूळ; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाने जपानचा ८ विकेट्सने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या उपांत्यपूर्व फेरीतला चौथा आणि शेवटचा सामना भारत आणि जपानच्या महिला क्रिकेट संघांमध्ये झाला. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक गमावल्यामुळे जपानच्या संघाला आधी फलंदाजी करावी लागली.
जपानने आधी फलंदाजी करताना संथ पण संयत सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्ये एकही विकेट गमावली नाही. सलामीवीर अयाका काटो-स्टॅफर्ड हिने संघासाठी महत्त्वाची २५ धावांची खेळी केली, तर हारुना इवासाकी हिने १० धावांचे योगदान दिले. या दोघींशिवाय जपानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी जपानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १० विकेट्स गमावून केवळ ५७ धावांत गारद झाला.
भारतीय गोलंदाजांमध्ये श्री चरणी हिने सर्वोत्तम कामगिरी करत चार विकेट्स घेतल्या. शेफाली वर्मानेही गोलंदाजीत चमक दाखवत दोन विकेट्स टिपल्या. श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. याशिवाय भारतीय क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत दोन जपानी फलंदाजांना धावबाद करत गोलंदाजीला उत्तम साथ दिली.
५८ धावांचे माफक लक्ष्य गाठताना मात्र भारताची सुरुवात अडखळती झाली. संघाने अवघ्या २४ धावांत दोन विकेट्स गमावल्या. जी. कमलिनी हिला खातेही उघडता आले नाही, तर भारती फूलमली हिला केवळ सहा धावा करता आल्या. या अडचणीच्या स्थितीत शेफाली वर्माने आक्रमक पवित्रा घेत अवघ्या १५ चेंडूंत ४० धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीदरम्यान तिचा स्ट्राईक रेट २६६.६७ इतका होता आणि तिने सहा चौकार व दोन षटकार लगावले.
यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोष हिनेही नाबाद १२ धावांची खेळी करत शेफालीला चांगली साथ दिली. या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने अवघ्या पाच षटकांत आणि दोनच विकेट्स गमावून सामना जिंकला. अशा प्रकारे भारतीय संघाने जपानचा ८ विकेट्सने सहज पराभव केला.
या दणदणीत विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीतला सामना २० सप्टेंबर रोजी बांगलादेशच्या संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून पदक पटकावण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.